नवी दिल्ली – संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा कालावधी (budget session of Parliament ) एक दिवसाने वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे अधिवेशन १० फेब्रुवारीपर्यंत चालेल. भारतीय अर्थव्यवस्थेची २०१४ यावर्षाआधीची आणि नंतरची स्थिती यांची तुलना करणारी श्वेतपत्रिका मोदी सरकार जारी करणार आहे. त्यासाठी अधिवेशनाचे कामकाज आणखी एक दिवस चालणार असल्याचे समजते.
अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीला सुरू झाले. ते ९ फेब्रुवारीला समाप्त होणार होते. मात्र, आता ते एक दिवस नंतर म्हणजे शनिवारी समाप्त होईल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी त्यांनी श्वेतपत्रिका जारी करण्याचे सूतोवाच केले.
आता सरकार ते पाऊल उचलण्यात सज्ज झाल्याचे स्पष्ट होत आहे. त्यातून आधीच्या यूपीए सरकारला आणि विशेषत: विरोधकांचे नेतृत्व करणाऱ्या कॉंग्रेसला घेरण्याची सत्ताधाऱ्यांची रणनीती सूचित होत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दिक फैरी तीव्र बनण्याची चिन्हे आहेत. त्याशिवाय, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अर्थव्यवस्थेवरून राजकारणही तापण्याची शक्यता आहे.