जामखेड – लग्नापूर्वी जन्मलेल्या बाळास जिवंत पुरल्याची घटना तालुक्यातील नायगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणावरून पोलिसांनी आई-वडिलासह त्या बाळाच्या आजीवर गुन्हा गुन्हा दाखल केला आहे.
सासरवाडीतील लोकांच्या छळास कंटाळून घटनेतील एका मयत आरोपीने काही दिवसांपूर्वीच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याबाबत एक चार पाणी चिठ्ठी देखील लिहुन ठेवली होती. त्यातून हा प्रकार समोर आला आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, घटनेतील मयत हरिश्चंद्र राजेंद्र जाधव व आरोपी पत्नी सविता कैलास जाधव यांचे लग्नापूर्वी चार वर्षापासून प्रेमसंबंध होते.
या प्रेम संबंधामधुन त्यांना विवाहापूर्वीच पुरुष जातीचे बाळ जन्माला आले होते. यानंतर यातील मयत आरोपी हरिश्चंद्र राजेंद्र जाधव, बाळाची आई सविता कैलास जाधव मयत बाळाची आजी विमल राजेंद्र जाधव यांनी संगनमताने नवजात बालकास ठार मारण्याचे ठरवले. यानंतर दि. 16 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बाळास घेऊन मयत बाळाचा बाप आरोपी हरिश्चंद्र जाधव हा नायगाव येथील बटईने करत असलेल्या शेतात बाळास घेऊन गेला.
यावेळी हे बाळ कपड्यात गुंडाळून प्लास्टिक पिशवीत घालून शेतातील एका पडलेल्या खदान विहिरीत खड्डा करून जिवंत पुरले. घटनेनंतर सदर मयत हरिश्चंद्र जाधव व पत्नी बाळाची आई सविता जाधव यांनी आळंदी या ठिकाणी जाऊन लग्न देखील केले होते. मात्र आरोपीने पंधरा दिवसांपुर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. यावेळी लिहुन ठेवलेल्या चिट्टीत सासरवाडीकडील लोकांवर गंभीर आरोप केले होते. माझ्या बाळास सारवाडीच्याच लोकांनी मारून टाकले आहे, असा आरोप देखील चिट्टीत केला होता.
या प्रकरणी सासरवाडीकडील लोकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून पोलीस या घटनेचा तपास करत असताना यामध्ये बाळाची आई, वडील व आजी हेच बाळाचे मारेकरी निघाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस कॉंन्टेबल शेषराव म्हस्के, पोलीस नाईक शेंडे, अशोक बडे, बाळू खाडे, महिला पोलीस आयोद्या घोगरे यांच्या पथकाने मागील पंधरा दिवसांपासून तपास करत घटनेचा छडा लावला. या प्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनचे सपोनी महेश जानकर यांच्या फिर्यादीवरून वरील तीन जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.