कराड, (प्रतिनिधी) – प्रस्थापित राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीत खर्या दलितांना डावलून, बोगस मागासवर्गीयांना उमेदवारी दिली आहे. बनावट जात प्रमाणपत्रे बनवून सवलतींचा लाभ घेणार्या बोगस मागासवर्गीयांचा राज्यात सुळसुळाट झाला आहे,
असा आरोप दलित महासंघ आणि बहुजन समता पक्षाचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे यांनी कराड येथे पत्रकार परिषदेत केला. याच्या निषेधार्थ बहुजन समता पक्ष आणि दलित महासंघाच्यावतीने शुक्रवारी (दि. 5) भाजप नेते डॉ. अतुल भोसले आणि शनिवारी (दि. 6) माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरांसमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दलित महासंघाचे राज्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, कराड तालुकाध्यक्ष जयवंत सकटे, बहुजन समता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राम दाभाडे उपस्थित होते. प्रा. सकटे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मातंग समाजाला राजकीय पक्षांनी बेरजेत धरलेले नाही. राज्यात अनुसूचित जातीच्या एकूण लोकसंख्येच्या 90 टक्के पूर्वाश्रमीचे महार आणि मातंग समाज आहे.
मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्ष मांग आणि महार जातीतील लोकांना उमेदवारी न देता, ज्यांची लोकसंख्या नगण्य आहे, अशा जातीतील लोकांना उमेदवारी देत आहेत.
बोगस उमेदवार अनुसूचित जातीच्या जागांवर उभे करून खर्या दलितांच्या राजकीय हक्कांवर गदा आणली जात आहे. अमरावती, रामटेक, शिर्डी, सोलापूर आणि लातूर हे पाच लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहेत. गतवेळी भाजपने सिद्धेश्वर शिवाचार्यांना उमेदवारी दिली. बनावट जात प्रमाणपत्रामुळे न्यायालयाने त्यांची उमेदवारी रद्द केली.
मात्र, बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी अनुसूचित जातीची जागा पाच वर्षे बळकवली. अमरावतीत नवनीत राणांनी पाच वर्षे खासदारकी भोगली. त्यांच्या जात प्रमाणपत्राचा वाद सर्वोच्य न्यायालयात सुरु आहे.
लातूर लोकसभा मतदारसंघातील डॉ. शिवाजी कोळगे हे लिंगायत असूनही, त्यांनी माला जंगम जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे. या बोगस मागासवर्गीयाला काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी आम्ही करणार आहोत.
मागासवर्गीय समाजावर होणारा अन्याय डॉ. भोसले व आ. चव्हाण यांनी आपापल्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना सांगून, तो दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रस्थापित राजकीय पक्षांचे काय करायचे? लोकसभा निवडणुकीत कोणती भूमिका घ्यायची, याचा विचार करण्यासाठी मुंबईत लवकरच राज्यव्यापी बैठक घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.