गोरगरिबांच्या धान्यांवर “घुसखोरी’
वाघोली – हवेली तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या धान्याला काळाबाजारचा रस्ता दाखविला जात असल्याची चर्चा जोर पकडत आहे. त्यामुळे अधिकारी आणि दुकानदार यांच्यातील “मिलीभगत’ गोरगरीबांच्या मुळावर उठली आहे. हवेली तालुक्यात रेशनिंगचा काळबाजार हा आजही अव्याहतपणे सुरू असल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्यांतून उमटत आहे. गोरगरीबांच्या धान्यांवर दलालांची “घुुसखोरी’ इमानेइतबारे सुरू आहे. यावर महसूल प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हवेली तालुक्यात रेशनिंगच्या धान्याचा काळबाजार तेजीत आहे. यासाठी मोठे रॅकेट हवेली तालुक्यात कार्यरत आहे. धान्याचा काळबाजार करणाऱ्यांवर कारवाई करण्यापूर्वीच त्यांना सुगावा लागत असल्यामुळे भ्रष्टाचाराची कीड खोलवर रुजली असल्याचे विदारक वास्तव दिसत आहे. रेशनिंग धान्यांमध्ये घुशींची लागण झाल्यामुळे हवेली तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांतील वितरण प्रणाली धोक्यात आहे. काळाबाजार रोखण्यासाठी राज्य शासनाकडून बायोमेट्रीक प्रणाली राबविली आहे. मात्र, ही यंत्रणा कुचकामी ठरली आहे. त्यामुळे रेशनिंगचा काळाबाजार कधी रोखणार, असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतून होत आहे.
हवेली तालुक्यात सध्या अनेक कुटुंबांमध्ये शिधापत्रिकेवर अनेकांची नावे असताना केवळ एकाच व्यक्तीला रेशनिंग दुकानातील धान्य मिळाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. पुरवठा विभागाकडे वारंवार कागदपत्रे सादर करून तांत्रिक बाबीचे कारण पुढे करत अनेकजण वंचित आहेत. हे धान्य काळाबाजारात विक्री होत असतानाही संबंधित विभाग गांधारीची भूमिका घेत आहे. रेशनिंगचा काळाबाजार रोखण्यासाठी व त्याची तपासणी करून संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
लोकसंख्येने जास्त असणारे गावांमध्ये तसेच बाजारपेठेच्या गावांमध्ये स्वस्त धान्य दुकानातील धान्य आणले जात आहे. त्याची बाजारात बेकायदा विक्री होत आहे. यासाठी हवेली तालुक्यातील तसेच लगतच्या तालुक्यांतील मोठ्या आठवडे बाजारांचा वापर होत आहे. धान्य दुकानातून आणलेले धान्य त्याची पोती बदलून विकली जात आहेत. त्यामुळे दलालांना पकडण्यासाठी सध्यातरी पुरवठा विभागाच्या पथकाकडून शक्य नाही. गेल्या चार महिन्यांपूर्वी थेऊर येथील प्रकार चव्हाट्यावर आला असताना संबंधित प्रशासनाचा कारभार पुन्हा प्रकाशझोतात आला होता. त्यावेळी संबंधित प्रशासनाला जागरूक नागरिकांनी धारेवर धरून रेशन दुकानदारांना ताळ्यावर आणले होते.
बायोमेट्रीक प्रणाली कुचकामी?
बायोमेट्रीक प्रणालीव्दारे बिघाड येत आहे. काही लोकांचे अंगठे स्वीकारले जात नाहीत. यात वयोवृद्ध लोकांचा समावेश आहे. बायोमेट्रीक पद्धतीने धान्य द्यावे, अशी मागणी तत्कालीन आमदार अशोक पवार यांनी चार वर्षांपूर्वी केली होती. पूर्वी मयत लोकांच्या नावावरील धान्यांची लूट केली जात होती. स्वस्त धान्य दुकानातून दिलेल्या मालाची पावती दुकानदाराने देणे बंधनकारक आहे तर माल खरेदी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने पावतीची मागणी करणे देखील बंधनकारक आहे. त्यामुळे हवेली तालुक्यात धान्यांचा काळबाजार करणाऱ्या व्यवहारांना आळा बसेल. तसेच स्वस्त धान्य दुकानांवरील विश्वास वाढीस लागणार आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांची मानसिकता पारदर्शक असणे गरजेची आहे. हवेली तालुक्यातील काळाबाजार करणारी साखळी मोडीत काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी हवेली तालुक्यातील नागरिकांकडून केली
जात आहे.