नवी दिल्ली – इंडिया आघाडीच्या तुलनेत भाजपची युती ही शरणागत पक्षांची युती असल्याची टीका ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. भाजप प्रणीत एनडीए ही मजबुरीतून झालेली युती आहे, त्यामानाने इंडिया आघाडीची २६ पक्षांची आघाडी ही खरी लोकशाही आघाडी आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
चतुर्वेदी यांनी दावा केला की इतर पक्षांना त्यांचे मत व्यक्त करण्यात किंवा पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीत निर्णय घेण्यास प्रतिबंधित वाटते, त्यामुळे त्यांची ही भाजप प्रणित विविध पक्षांची यती म्हणजे केवळ “शरणागत युती” आहे. कारण प्रत्येकाला माहित आहे की त्यांनी जुलूमशाहीला पाठिंबा दिला तरच ते जिंकू शकतात. भाजपने देश, लोकशाही आणि संविधान बाजूला ठेवले आहे. आणि त्यांच्या युतीतील सर्व पक्षांनाही ते मान्य आहे. ते पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यासमोर बोलू शकणार नाहीत किंवा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकणार नाहीत किंवा ते स्वताची बाजू मांडू शकणार नाहीत, म्हणून त्यांनी शरणागती पत्करली आहे. ही शरणागती युती आहे,असे प्रियंका चतुर्वेदी यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
याउलट, चतुर्वेदी यांनी इंडिया आघाडी या 26 पक्षांच्या आघाडीच्या लोकशाही स्वरूपाची प्रशंसा केली. इंडिया आघाडीत मतभेद असू शकतात, पण ते लोकशाहीचे सौंदर्य आहे. हा चर्चेचा विषय आहे. मला आशा आहे की जागा वाटपाबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल आणि आम्ही देशाच्या संविधानासाठी आणि देशातील जनतेसाठी सर्वजण ही लढाई जोरदारपणे लढू आणि त्यात विजयी होऊ.
२०२४ च्या लोकसभा निवडणुका जवळ येत असताना भारताच्या राजकीय परिदृश्यात महत्त्वपूर्ण संक्रमण होत आहे. विरोधकांची इंडिया आघाडी प्रस्थापित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आव्हान देण्यासाठी सज्ज आहे. जागा वाटपाच्या व्यवस्थेला अंतिम रूप देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंतप्रधान चेहरा ठरवणे यासह महत्त्वाच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी हा गट सध्या प्रयत्नशील आहे.