नवी दिल्ली: चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपी ५ वर आला आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था अत्यंत चिंताजनक स्थितीत असल्याचा आरोप माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी केला होता. हा आरोप भाजपने फेटाळून लावत मनमोहन सिंग यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेला भ्रष्टाचार आणि राजकीय घराणेशाहीमुळे अर्थ व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या कार्यकाळात अर्थ व्यवस्थेला मजबूत आधार मिळाल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रांनी केला आहे.
पात्रा म्हणाले की, मनमोहन सिंग माजी पंतप्रधान असून वयाने मोठे आहेत. परंतु, त्यांच्या कार्यकाळात भारताची जी प्रगती होणे अपेक्षित होते, ती झाली नाही. मनमोहन सिंग अर्थतज्ज्ञ होते, परंतु, ज्या लोकांनी त्यांना पडद्यामागून निर्देश दिले ते लोक भ्रष्टाचारात अलिप्त होते. त्या लोकांमुळे घराणेशाहीला वाव मिळाला आणि अर्थव्यवस्थेचे नुकसान झाले. तसेच सध्या जागतिक पातळीवर भारताची विश्वसार्हता वाढल्याचे त्यांनी नमूद केले.