राजीव गांधींवर टीका केल्याने कॉंग्रेसकडून तीव्र पडसाद
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका प्रचार सभेत बोलताना राहुल व प्रियांकांचे वडिल दिवंगत राजीव गांधी यांच्यावर एक आक्षेपार्ह टिपण्णी केली होती. स्वताला मिस्टर क्लीन म्हणणारे पंतप्रधान एक नंबरचे भ्रष्टाचारी ठरले असे विधान मोदी यांनी केले होते त्यावर कॉंग्रेसकडून तीव्र टीका करण्यात आली आहे.
या संबंधात स्वता राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की मोदीजी आता लढाई संपली आहे आता आपल्या कर्माची फळे भोगण्यास तयार राहा. आपल्या मनातील जळजळ तुम्ही माझ्या वडिलांवर काढली असली तरी त्यातून तुमचे रक्षण होणार नाही. माझे तुम्हाला प्रेमाचे अलिंगनच राहील असे त्यांनी म्हटले आहे. प्रियांका गांधी, ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, अखिलेश यादव, इत्यादींनीही मोदींच्या या प्रकारच्या टीकेचा निषेध केला आहे. पी चिदंबरम यांनी म्हटले आहे की 1991 साली हत्या करण्यात आलेल्या देशाच्या दिवंगत पंतप्रधानांविषयी अशी अभद्र टिपण्णी करून मोदींनी सर्व मर्यादा ओलांडली आहे.
प्रियांका गांधी यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे की शहीद जवानांच्या नावाने मते मागून राजकारण करणाऱ्या मोदींनी काल एका महान नेत्याच्या बलिदानाचा अवमान केला आहे. अमेठीचे मतदार त्यांच्या या विधानाला चोख प्रत्युत्तर देतील. राजीव गांधी यांनी आपले सारे जीवन अमेठीसाठी दिले होते. मोदीची या देशातील जनता असा अवमान कधीच विसरत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
मोदी स्वताच्या सरकारचे निर्णय तरी वाचतात का?
चिदंबरम यांनी मोदींवर या प्रकरणी निशाणा साधताना म्हटले आहे की मोदी हे स्वताच्या सरकारचे निर्णय तरी वाचतात काय याची मला शंका आहे. बोफोर्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लाऊन त्यांना निर्दोष सिद्ध केले होते. आणि विशेष म्हणजे भाजप सरकारनेच या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अपिल न करण्याचा निर्णय घेतला होता. मोदी काहींच वाचत नाहीत आणि ते न वाचताच दुसऱ्यांवर टीका करीत असतात असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.