खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
नारायणगाव (वार्ताहर) – महाराष्ट्रातील शेतकऱ्यांशी निगडित आणि ग्रामीण भागात आर्थिक स्रोत समजल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याची मागणी शिरूर लोकसभा सदस्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी हिवाळी अधिवेशनात केली आहे.
लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात काल मंगळवारी (दि. 19) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यतीचा मुद्दा उपस्थित केला. बैलगाडा शर्यती हा शेतकऱ्यांचा आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. शेतकरी हा बैलगाडी शर्यतीसाठी खिलार जातीच्या वंशाचा वापर करतो. खिलार जात प्रामुख्याने महाराष्ट्रात आहे. ग्रामीण भागात बैलगाडा शर्यतीवर आर्थिक स्रोत अवलंबून आहे. या बैलांचा शेतकरी स्वतःच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतो. त्याला जीव लावतो; पण शर्यतींवरील बंदीमुळे या बैलांना कत्तलखान्यात नेले जाते आहे, ही बाब दुर्दैवी आहे.
केंद्र सरकार पर्यावरण विभागाचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची खासदार कोल्हे यांनी भेट घेऊन याबबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तामिळनाडूत होणाऱ्या जलीकट्टूप्रमाणे महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्याची मागणी केली आहे. या भेटीत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी खासदार डॉ. कोल्हे यांची भूमिका समजून घेऊन, या संदर्भात पुढील आठवड्यात चर्चा करण्याचे आश्वासन
दिले आहे.