मुंबई : औरंगाबाद जिल्ह्याचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नाव बदलून धाराशिव करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने नुकतीच परवानगी दिली आहे. मात्र याच निर्णयावरुन आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. कारण एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी या निर्णयाला विरोध करत आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्यासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत.
केंद्र आणि राज्य सरकारने औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केल्याने आजपासून एमआयएम रस्त्यावर उतरणार आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दुपारी तीन वाजेपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात होणार आहे. यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह एमआयएमचे अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत.
औरंगाबाद नामांतर कृती विरोधी समितीच्या अंतर्गत हे उपोषण केले जाणार असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे. तर आजपासून सुरु होणारे हे उपोषण कधीपर्यंत सुरु राहिल, याबाबत सांगता येणार नाही असा इशारा देखील जलील यांनी दिला आहे.
नामांतराच्या विरोधात आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु होणार असल्याने, जलील यांनी शुक्रवारी उपोषणस्थळाची पाहणी केली. उपोषणाला मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत काही सूचना देखील पदाधिकाऱ्यांना दिल्या. सोबतच सिटी चौक पोलीस स्टेशनला भेट देत आजच्या उपोषणाबाबत पोलीस अधिकाऱ्यांशी देखील चर्चा केली. त्यामुळे आजच्या उपोषणाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर उपोषणास्थळी पोलिसांकडून मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या उपोषणाला अनेक राजकीय संघटनांनी देखील पाठिंबा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.