मुंबई – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सुरू असलेल्या बारावीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने सोशल मीडियावरून व्हायरल झाली. हा प्रकार बुलढाण्यातील एका परीक्षा केंद्रावर घडला होता. यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. यासंबंधी पाऊले उचलत प्रशासनाने चार परीक्षा केंद्राचे संचालक बदलले आहेत.
पुन्हा एकदा कोणताही गैरप्रकार होऊ नये आणि शिक्षन विभागाला त्याचा फटका बसू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे समजते. बारावीच्या परीक्षा पेपर फुटीची बातमी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली होती. विधिमंडळात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले होते.
बारावीची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच प्रश्नपत्रिका फुटल्याचे निदर्शनास आले होते. या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. तथापि, या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळून आलेले नाही. त्यामुळे पुन्हा परीक्षा घेतली जाणार नसल्याचे राज्य शिक्षण मंडळाकडून शुक्रवारी स्पष्ट करण्यात आले होते.
विधिमंडळात देखील उमटले पडसाद
बारावीचा गणिताचा पेपर बुलढाण्यात फुटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. यावरून हे सरकार झोपले आहे का असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपस्थित करत विधानसभेत संताप व्यक्त केला. अजित पवार म्हणाले, गणिताचा पेपर सुरू होण्याआधीच फुटला. अभ्यास करणाऱ्या मुलांचे यामुळे किती वाटोळे होते. सरकार झोपले की काय, काय चालले कळत नाही. मी बोललो की बोलता दादा बोलतात, अशा संतापलेल्या सुरात त्यांनी सरकारला धारेवर धरले.