लखनौ – समाजवादी पक्षाचे (सप) मित्रपक्षांबरोबरील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे सपच्या नेतृत्वाखालील उत्तरप्रदेशातील विरोधी पक्षांची आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. उत्तरप्रदेशात काही महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बाजी मारून भाजपने सत्ता राखली. पराभवानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीत धुसफूस सुरू झाली.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीनंतर ती आणखीच वाढली. सपने विरोधी पक्षांच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. तर, सपच्या मित्रपक्षाचे प्रमुख ओमप्रकाश राजभर यांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. सपचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे दुरावलेले चुलते शिवपाल यादव यांनीही राजभर यांच्यासारखी कृती केली. त्यामुळे दुखावलेल्या सपने राजभर आणि शिवपाल यांना पत्र पाठवले आहे. त्यांना आम्हाला सोडून जाण्याची मोकळीक आहे.
अधिक आदर मिळेल तिथे त्यांनी जावे, असे सपच्या पत्रात नमूद करण्यात आले. त्यातून एकप्रकारे विरोधी पक्षांच्या आघाडीतील फुटीवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे उत्तरप्रदेशात विरोधकांची ताकद काही प्रमाणात कमजोर होईल. ती बाब सत्तारूढ भाजपच्या पथ्यावर पडणारी असेल.