सासवड, (प्रतिनिधी)- काही जणांची गेली मती!! ,विकासाला देऊ गती,!! जिंकू आपली बारामती निवडणुकी विकासाची लढाई आहे. देश हा महासत्ता बनवायचा आहे, असे पंतप्रधान मोदींचे स्वप्न आहे. या देशाचे पंतप्रधान हे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा होणार आहेत,
असे जनमत व लोकांची भावना सांगत आहे. ही सभा टर्निंग पॉईंट ठरणार असून विजयाची सभा आहे. लोकांना विश्वासात घेऊन सर्व प्रकल्प हे पुढे जात असतात. त्यामुळे विमानतळाचा प्रकल्प पुढे नेत असताना लोकांना विश्वासात घेऊनच विमानतळ केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
सासवड (ता. पुरंदर) येथील पालखीतळावर महायुतीच्या वतीने जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, हे सरकार हे बाळासाहेबांच्या विचाराचे सरकार आहे. कोविडच्या काळामध्य स्थगित केलेली कामे पुन्हा सुरु केली आहेत. पुरंदरमधील आयटी पार्क, गुंजवणीच्या पाण्याचा प्रश्न तात्काळ मंजूर केला जाईल. विजय शिवतारे यांनी स्वतःसाठी काहीही मागितले नसून जनतेसाठी सर्व काही मागितले आहे.
अजित आणि विजय सोबत असल्यामुळे २ लाखांपेक्षा जास्त मताधिक्य या मतदारसंघात मिळालेच पाहिजे. तुम्ही दाबलेले बटन म्हणजे मोदींना मत आहे. आज आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असलो तरी सुद्धा कार्यकर्ते म्हणून काम करतो.
विजय शिवतारे या कार्यकर्त्याला आम्हाला घालवायचे नव्हतं. कार्यकर्ते कमवायला वेळ लागतो, गमवायला वेळ लागत नाही, असे सांगून एकनाथ शिंदे म्हणाले की, लोकांनी गॅरंटी घेतली आहे की, मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे. तुम्ही निवडणुकीत होणाऱ्या विजयाचे शिल्पकार बनणार आहात.
शिवतारे आणि तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की, धन्यवाद देतो की, बापूंवर प्रेम करता. त्यांच्या प्रेमापोटी त्यांच्यासोबत राहिलात शिवतारे यांचे खरं रूप आज पाहायला मिळाले. पुढचा पुरंदरचा किल्लेदार विजयबापू शिवतारे असतील असे प्रतिपादन समोर असलेला जनसमुदाय पाहून एकनाथ शिंदे यांनी केले. आपल्या उमेदवार सुनेत्रा अजितदादा पवार आणि घड्याळ आहे. शिवसैनिकांना घड्याळ दाबायची सवय नाही पण एक एक मत अमूल्य आहे.
अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक ही भावकी किंवा बाजार समितीची निवडणूक नाही तर ही देशाच्या ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी त्याचबरोबर विकासकामे करण्यासाठी ही निवडणूक आहे.
मागील खासदाराच्यापेक्षा चांगले काम आत्ताचा खासदार करेल व सरकारमध्ये असल्यानंतर अनेक योजना हाती घेता येतात. त्यामुळे लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम सुनेत्रा पवार या करतील. वीर धरणांमधून विसर्ग होणारे पाणी पुरंदरमध्ये आणून नाझरे धरण भरण्याचा संकल्पही आमचा आहे.
संपूर्ण मतदारसंघात बारामती, पिंपरी पॅटर्न
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ही निवडणूक विचाराची व विकासाची तसेच देशाला पुढे नेण्यासाठी आहे. त्यामुळे आपले प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. पुरंदरमधील दिवे येथे आयटीआय पार्क तसेच सासवडपर्यंत मेट्रो आणण्यासाठी सत्ताधारी पक्ष निश्चित काम करेल यासाठी बारामती मतदारसंघातून सत्ताधारी पक्षाचा खासदार निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे.
महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर बारामती व पिंपरी चिंचवडसारखा बारामती लोकसभा मतदारसंघाचा विकास करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले
मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तह
माजी राज्यमंत्री विजय शिवतारे म्हणाले की, विमानतळ, गुंजवणी, पुरंदरमध्ये आयटी पार्क झाले तर एक लाख जणांना नोकरी मिळतील. फुरसुंगीतील सर्व वाड्या वस्त्यावर पाणी दिले पाहिजे. पुरंदर उपसा नीट चालली पाहिजे. अजित पवारांनी ५६ कोटींचा निधी दिल्यामुळे आता ही योजना व्यवस्थित चालेल.
क-हानदीत पाणी सोडले तर बारामती तालुक्यातील गावांनाही बारमाही पाणी मिळेल. पुणे -दौंड लोकलबाबत विचार व्हावा, लोकसभा मतदारसंघातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मी तह केला असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कृषी व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार अशोक टेकवडे, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष जालिंदर कामठे, ज्योती वाघमारे, शिवसेनेच्या तालुकाध्यक्षा ममता लांडे- शिवतारे, आरपीआयचे सचिन खरात, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डाँ. दिगंबर दुर्गाडे, राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुरंदर -हवेलीचे निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव,
शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप यादव, भाजपाचे तालुकाध्यक्ष निलेश जगताप, राष्ट्रवादीचे अध्यक्ष उत्तम धुमाळ, भूषण ताकवले, रमेश इंगळे, सचिन खरात, मंगलदास बांदल, राजलक्ष्मी भोसले, स्वाती टकले, बाळासाहेब कामठे, भूषण ताकवले, नितीन कुंजीर उपस्थित होते.