नवी दिल्ली- मुलींच्या लग्नाच्या वयाबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. या संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर लगेचच निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
नरेंद्र मोदी म्हणाले, मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावे यासंबंधी चर्चा सुरु आहे. संपूर्ण देशभरातील मुलींनी मला अद्यापही संबंधित समितीने अहवाल सादर केला नसल्याबद्दल विचारणा केली आहे. मी त्या सर्वांना आश्वस्त करतो की अहवाल आल्यानंतर लगेचच सरकार त्यावर निर्णय घेईल.
लग्न आणि आई होण्याचे वय यामधील नेमका संबंध जाणून घेण्यासाठी केंद्र सरकारकडून 22 सप्टेंबर रोजी टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या आरोग्य आणि स्वच्छतेसाठी घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. प्रत्येक मुलीच्या हिताची आपण काळजी घेत आहोत. जल जीवन मोहिमेअंतर्गत प्रत्येक घराला पाणी पोहोचवण्याचे काम सुरु आहे. 1 रुपयात सॅनिटरी पॅड उपलब्ध केले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.