नगर – संकलित कराची वसुली होत नसल्याने स्थायी समिती सदस्यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 2003 नंतर मालमत्ताचे मुल्यांकन झाले नसल्याचे सभेत निदर्शनास आले. अनेक मालमत्तांची मनपाकडे नोंद नसल्याने मनपाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत मालमत्तांचे मुल्यांकन करून स्थायी समितीला अहवाल सादर करावा, अशा सूचना स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले यांनी अधिकार्यांना केल्या आहेत.
मनपाच्या सन 2021-22 या आर्थिक वर्षाच्या प्रशासनाने 684 कोटी 89 लाखांच्या सादर केलेल्या अर्थसंकल्पावर आज स्थायी समितीच्या सभागृहात चर्चा झाली. यावेळी ते बोलत होते. आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त डॉ. प्रदीप पठारे, यशवंत डांगे, मुख्यालेखावित्त अधिकारी प्रवीण मानकर, नगरसचिव एस.बी. तडवी यांच्यासह स्थायी समितीचे सदस्य मुदस्सर शेख, प्रकाश भागानगरे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, सागर बोरुडे, मनोज कोतकर, रवींद्र बारस्कर उपस्थित होते.
मालमत्ता मुल्यांकनाची जबाबदारी उपायुक्त यशवंत डांगे यांच्यावर सोपविली असून संकलित कराची वसुलीचा आढावा पंधरा दिवसांनी घेतला जाणार आहे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. अर्थसंकल्पात महसुली उत्पन्नात संकलित करापोटी 40 कोटी 50 लाखांचा अंदाजित जमा धरण्यात आले असून स्थायी समितीने त्यात 10 कोटी रुपयांची वाढ सुचविली आहे.