वडगाव मावळ – पोलिसांनी जरी माझे गुन्ह्यात नाव घेतले असले तरी कोणीतरी “त्या’ मातेला भडकवून माझे नाव गुन्ह्यात घ्यायला लावले. पोलिसांचा तपास संपल्यावर सर्व बाबी समोर येतील, असे असा विश्वास आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.
आमदार शेळके समर्थकांनी रविवारी (दि. 14) तळेगाव येथे काढलेल्या मोर्चासमोर ते बोलत होते. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक माऊली दाभाडे, एसआरपीचे अध्यक्ष रमेश साळवे, मच्छिंद्र खराडे, आशिष ठोंबरे, रुपाली दाभाडे, मंजुश्री वाघ यांनीही यावेळी निषेध व्यक्त केला.
यावेळी बोलताना आ. शेळके म्हणाले की, माझ्यावर हत्या केल्याचा गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यावर तुम्ही सगळे प्रेमापोटी आलात. जनता म्हणते सुनील शेळके आमच्यासाठी काम करू शकतो, मात्र कोणाच्या जिवावर उठू शकत नाही. आज माझ्यासाठी एवढी जनता रस्त्यावर उतरली हीच माझ्या कामाची पावती आहे. राजकारणात विरोधक संधी शोधत असतात आणि जिथे संधी मिळेल तेथे फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आमदार झाल्यापासून माझ्या व्यवसायाची व कुटुंबीयांची चौकशी सुरू होती. चौकशीमधून मला न्यायालयापर्यंत खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र नीतीमत्ता चांगली ठेऊन चांगले काम केल्याने त्याचे फळ आज देखील मला मिळत आहे.
किशोर आवारे यांच्या हत्येच्या आडून कोण कटकारस्थान करतय हे जनतेला माहिती आहे. एखाद्या कुटुंबावर आघात झाल्यावर आपण त्या कुटुंबाच्या पाठीशी उभ राहील पाहिजे. पण त्या कुटुंबाला भडकवून पोलिसांवर दबाव आणण्यासाठी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला जात आहे. किशोर आवारे यांनी देखील माझ्यासाठी काम केले. आमचे मतभेद असतील. आम्ही राजकारणात एकमेकांवर टीका करू. पण कोणाच्या जिवावर बेतेल असे राजकारण करण्याची माझ्यावर वेळ आलेली नाही. मी राजकारणात असो वा नसो कधीच चुकीचे काम करणार नाही.
आमदार शेळके यांच्या समर्थकांकडून पोलीस प्रशासनाच्या निषेधार्थ रविवारी तळेगाव येथील मारुती चौक ते आमदार शेळके यांच्या घरापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार समर्थक, पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवल होता.