सातारा – दौलतनगर, ता. पाटण येथील कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढील आठवड्यात प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत बैठक लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष व धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
यासंदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, शनिवार, दि. 13 रोजी दौलतनगर येथे श्रमिक मुक्ती दलाच्या शिष्टमंडळाबरोबर ना. शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक आयोजित केली होती.
त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न समजावून घेतले. येत्या आठवड्यात कोयना उच्चधिकार समितीची बैठक घेऊ व पुढील आठवड्यात राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर श्रमिक मुक्ती दलाबरोबर बैठक घेऊ, असे आश्वासन दिले आहे.
प्रकल्पग्रस्तांच्यावर अन्याय करणारे दोन शासन निर्णय काढले आहेत, ते दुरुस्त करावेत. कोयना प्रकल्पग्रस्तांचे कालबद्ध आराखडा करून पुनर्वसन करावे, यासाठी सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली बेमुदत आंदोलन कोयनानगर, बामणोली व कोल्हापूर येथे सुरू केले होते.
कोयनानगर येथील आंदोलनात येऊन राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची एक महिन्याच्या आत बैठक घेऊन प्रश्न सोडवू असे लेखी पत्र दिले होते. त्यास आधीच उशीर झाला आहे, त्यामुळे ना. देसाई यांच्या पुढाकाराने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बैठक आयोजित केली होती.
यावेळी मुख्यमंत्री यांनी प्रकल्पग्रस्तांचे सर्व प्रश्न डॉ. पाटणकर यांच्याकडून समजावून घेतले आणि सरकार प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत सकारात्मक असून सर्व प्रश्न सोडवू असे, आश्वासन मुख्यमंत्री यांनी दिले. या बैठकीस डॉ. भारत पाटणकर, ना. शंभूराज देसाई, यांच्यासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, संतोष गोटल, सचिन कदम, महेश शेलार, हे उपस्थित होते.