मुंबई – राजापूर तालुक्यातील रिफायनरी प्रकल्पावरून कोकणातील वातावरण तापले आहे. ठाकरे गटाने प्रकल्पाला विरोध केला असला तरी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी प्रकल्पाला समर्थन असल्याचे ट्विट केले आहे. प्रकल्पासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू झाले असले तरी मात्र स्थानिकांकडून यासाठी विरोध होताना दिसून येत आहे.
याविरोधात नागरिकांनी आंदोलन पुकारले आहे. तर ठाकरे गटाकडून स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी ठाकरे गटाचे राजापुरातील स्थानिक आमदार राजन साळवी यांनी मात्र प्रकल्पाला ट्विट करत समर्थन दर्शविले आहे.
साळवी ट्विटमध्ये म्हणतात की, कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच! विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू प्रशासनाने पटवून द्यावी, त्यांच्यावर अन्याय करू नये, असे म्हणत त्यांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टॅग केले आहे.
बेनामी मालमत्ता जमवल्याप्रकरणी आमदार साळवी यांची मागील काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. आतापर्यंत साळवी हे चार वेळा चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यांचे स्वीय सहायक मालप यांचीदेखील चौकशी करण्यात आली. एसीबीकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने साळवी यांचे राहते घर आणि रत्नागिरीतील हॉटेलचे मूल्यांकन करण्यात आले. एसीबीने साळवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबालाही चौकशीसाठी पाचारण केले.
कोकणातील बेरोजगारीच्या मुद्द्यावर प्रकल्पाला समर्थनच….
माझ्या विरोध करणाऱ्या नागरिकांना प्रकल्पाची बाजू पटवून प्रशासनाने द्यावी त्यांच्यावर अन्याय करू नये…. @samant_uday @CMOMaharashtra @Dev_Fadnavis— M L A Rajan Salvi (@MLARajanSalvi) April 26, 2023
ठाकरेंचे निष्ठावान म्हणून ओळख
राजन साळवी हे महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आहेत. ते शिवसेनेचे सदस्य म्हणून कोकण, महाराष्ट्र, भारतातील राजापूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान विधानसभेचे सदस्य आहेत. 2009, 2014 आणि 2019 मध्ये ते महाराष्ट्र विधानसभेवर सलग तीन वेळा निवडून आले आहेत.