रत्नागिरी – बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार राजकारणाचे वारे वाहत आहेत. या रिफायनरीवरून राजकीय नेतेमंडळी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच सरकारने येत्या 11 मेपर्यंत रत्नागिरीत मनाई आदेश लागू केले आहेत. त्यामुळे या रिफायनरीच्या वादाचा फटका आता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे.
मे महिन्याच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी सर्वांनी कोकणाची वाट धरली आहे. मुंबईसह राज्याच्या अनेक भागांतून चाकरमानी कोकणात जात आहेत. कोकणाचे सौदर्य डोळ्यांत टीपण्यासाठी रेल्वे गाड्याही प्रवाशी आणि पर्यटकांनी भरून जात आहेत. मात्र, मनाई आदेशामुळे कोकणात जाणारे चाकरमानी संताप व्यक्त करत आहेत.
बारसू (राजापूर) येथे सुरू असलेल्या माती परीक्षण प्रक्रियेला होणारा विरोध, 1 मे या कामगार दिनाच्या अनुषंगाने विविध ठिकाणी होणारी आंदोलने, 5 मे रोजी बौद्ध पौर्णिमा सण या अनुषंगाने किरकोळ कारणावरून कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी आजपासून 11 मे पर्यंत जिल्ह्यात महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.