नगर – अडीच वर्षांपूर्वी आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वांना भेटण्यासाठी वेळ द्या, असे सांगत होतो, परंतु त्यावेळी त्यांनी ऐकले नाही. आता थेट गट प्रमुखांचे मेळावे घेतात याचाच अर्थ, आम्ही जनतेत जात असल्याने ते आता जागे झाले आहेत. आतापर्यंतच्या काळात शिवसेनेचा दसरा मेळावा होण्यापूर्वी तयारीचा मेळावा घेण्याचा प्रकार पहिल्यांदाच होत आहे. मुंबईत आता पक्षप्रमुखांना गटप्रमुखांचे मेळावे घ्यावे लागतात, यातच सारे काही आले, असा टोला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला.
नगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे समर्थकांचा हिंदू गर्व गर्जना मेळावा झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जात असले तरी तेथे केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त- निधी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. मध्यंतरी निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी 19 हजार कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधानांनीही महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प रखडू घेणार नाही व त्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे.
आठवड्यातून एक दिवस आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख व कार्यकर्त्यांना देण्याचे सांगत होतो पण ते तेव्हा केले नाही.आधी पक्षातील मोठ्या लोकांना त्यांची भेट मिळत नव्हती. आता मातोश्रीचे दरवाजे 24 तास उघडे असल्याचे सांगतात, परंतु हे करण्याचे आम्ही अडीच वर्षांपूर्वी सांगत होतो. आता लोकांना भेटता का तर आम्ही आता लोकांना भेटत आहोत, त्यांचे प्रश्न जाणून घेत आहोत म्हणून आता त्यांनीही सुरू केले आहे. चांगले आहे, आम्ही कोणाशीही स्पर्धा करीत नाही, असेही देसाई यांनी आवर्जून स्पष्ट केले.
आरक्षणासाठी समिती
मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वीच मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपसमिती नेमण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला व मराठा आरक्षणाबाबत सहा जणांची समिती गठित केली आहे. या समितीच्या बैठका दर आठवड्याला होतील. जे प्रश्न आहेत, ते तातडीने सोडवून मराठा आरक्षण आश्वासनाच्या पूर्तीसाठी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती काम करेल, असे देसाई म्हणाले.
लव्ह जिहादबाबत कठोर कारवाई
जिल्ह्यात लव्ह जिहादच्या घटना वाढत आहेत.त्यासंदर्भात महसूलमंत्री विखे यांच्याशी चर्चा करणार आहे. पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून माहिती घेणार आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, यासाठी कारवाई करण्याच्या सूचना देणार असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले.
बीकेसी मैदानाचा पर्याय
मुंबईत 5 तारखेला दसरा मेळावा होण्यासाठी आम्ही शिवाजी पार्कच्या मैदानासाठी महापालिका आयुक्तांकडे अर्ज केला आहे. तसाच अर्ज उद्धव ठाकरे यांच्या गटाने केला आहे. आयुक्त याबाबतचा अंतिम निर्णय घेतील. आम्हाला जर शिवाजी पार्कचे मैदान मिळाले नाही तर बीकेसी मैदानाचा पर्याय शिल्लक असल्याने परवानगसाठी अर्ज केल्याचे सांगितले.