Sanjay Raut On Prakash Ambedkar| वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेद्वारे आमची शिवसेनासोबतची युती संपुष्टात आल्याचे सांगितले. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव असल्याचे संजय राऊत यांनी म्हंटले आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
“प्रकाश आंबेडकर यांनी युती तुटल्याची एकतर्फी घोषणा केली हे दुर्दैव आहे. याबाबत दोन नेत्यांत चर्चा होणं गरजेचं होतं. युती करताना चर्चा झाली होती, तर मग दूर होतानाही चर्चा होणं गरजेचं होतं. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. आम्ही लोकसभा निवडणुकीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला आहे. हा प्रस्ताव अजूनही कायम आहे,” असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
“प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडीबरोबर शिवसेनेची (ठाकरे गट) युती झाली. त्याला दीड वर्षे होऊन गेले. ही युती अत्यंत चांगल्या हेतूने झाली होती. ही युती करताना विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र काम करता येईल, असे ठरले होते. लोकसभा निवडणुकीचा त्यावेळी विचार करण्यात आला नव्हता. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं खूप जुनं आहे. ही युती करताना राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करावं,” अशी भूमिका होती, असेही राऊत म्हणाले.
आंबेडकर निर्णयाचा फेरविचार करतील
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारासदाराने अत्यंत महात्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. जागावाटपात एक-दोन गोष्टी मागेपुढे होऊ शकतात. मात्र आंबेडकरांसोबतची युती हा राजकीय नव्हे तर भावनिक विषय आहे. आम्हाला खात्री आहे की, प्रकाश आंबेडकर त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील,” असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.
प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी 23 मार्च रोजी शिवसेना ठाकरे गटासह असलेली युतीबाबत मोठी घोषणा केली. “उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही. आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती, नाही तर युती नाही,” अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
हेही वाचा: