मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला.
आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असणारी शिंदे गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केले. भाजपच्या साथीने महाराष्ट्राची सत्ता सांभाळणाऱ्या शिंदे गटासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय सुखावणारा आहे.
दरम्यान, शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर आता ठाकरे गटाला टेन्शन देणारी आणखी एक बातमी समोर आली आहे. नुकतंच निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ हे पक्षाचे नाव आणि ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच वापरता येणार आहे.
26 फेब्रुवारीपर्यंतच या चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरण्याची मुदत आहे. त्यानंतर ठाकरे गटाला हे चिन्ह वापरता येणार नाही. त्यामुळे ठाकरे गटामध्ये पुन्हा एकदा खळबळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे.