मुंबई : देशभरात करोना संसर्ग झपाट्यानं वाढत असून महाराष्ट्रातील रुग्ण वाढ चिंताजनक आहे. त्यामुळे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत रुग्ण झपाट्याने वाढत असून लॉकडाऊनची स्थिती निर्माण झाली आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महत्त्वपूर्ण निर्णय़ घेतला आहे.
राज्यातील ठाकरे सरकारकडून करोनासंदर्भातील निर्बंध १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले आहे. राज्यात करोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक २८ मार्च २०२१) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वीच दिल्या आहेत.
Maharashtra government extends COVID-19 related restrictions till April 15
— ANI (@ANI) March 27, 2021
मुख्यमंत्री म्हणाले होते की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली, त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही ठाकरे यांनी आधीच दिल्या आहेत.