पुणे – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी-2020) गैरव्यवहार प्रकरणाच्या तपासात 7 हजार 800 अपात्र उमेदवारांना अपात्र ठरविल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. अपात्र उमेदवारांकडून प्रत्येकी एक लाख ते अडीच लाख रुपये घेण्यात आले असून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
शिक्षक पात्रता परीक्षा 2019-2020 मधील गैरव्यवहार प्रकरणाचा पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येत होता. याप्रकरणात शिक्षण परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे, शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर, जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नोलॉजीस कंपनीचा संचालक डॉ. प्रीतिश देशमुख, माजी संचालक अश्विनीकुमार तसेच शिक्षण परिषदेचे तत्कालिन आयुक्त सुखदेव डेरे यांच्यासह 30 ते 35 आरोपींना अटक केली आहे.
शिक्षक पात्रता गैरव्यवहार प्रकरणाचा तपासात उमेदवारांच्या “ओएमआर शीट’ची पडताळणी करण्यात आली. तेव्हा राज्यातील 7 हजार 800 अपात्र उमेदवारांना पात्र ठरवल्याचे उघड झाले असून सुपे यांच्याकडून कोट्यवधीव रुपयांची रोकड, दागिने असा ऐवज जप्त केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रकरणात अटक केलेल्या आरोपींची चौकशी करण्यात आली.
शिक्षक पात्रता परीक्षेतील प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येत असून 2019-2020 मधील राज्यातील 16 हजार 705 उमेदवारांनी टीईटी दिली होती. त्या सर्व उमेदवारांची ओएमआर शीटची तपासणी करण्यात आली. तपासणीत सात हजार 800 अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरवल्याचे गुप्ता यांनी सांगितले.