पुणे – दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा करोना पार्श्वभूमीवर नोव्हेंबर अथवा डिसेंबर महिन्यांत घेण्याचे नियोजन आहे. फेरपरीक्षा लांबणीवर पडल्याने दहावीत दोन विषयांत अनुत्तीर्ण झालेल्या म्हणजेच एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांना अकरावीला प्रवेश कसा होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी बुधवारी दिली. यंदा राज्यावर करोनाचे सावट असल्याने या परीक्षा नोव्हेंबर किंवा कदाचित डिसेंबरपर्यंतही लांबणीवर पडतील, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, दहावी-बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महिनाभरात फेरपरीक्षा घेतली जाते. त्यानंतर या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश दिला जातो. त्यादृष्टीने फेरपरीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होत नाही. त्यामुळे ही परीक्षा महत्त्वाची असते.