नवी दिल्ली – विदेशी गुंतवणूकदारांनी सप्टेंबरच्या पहिल्या तीन आठवड्यात भारतीय शेअर मार्केट मधून 10,000 कोटी रुपयांहून अधिक पैसे काढले आहेत. मंदीची भिती आणि भारतीय कंपन्यांनी कृत्रिमरित्या फुगवलेल्या शेअर्सच्या किंमतीच्या आरोपामुळे त्यांनी हे पैसे काढून घेतल्याचे मानले जात आहे. अमेरिकेने त्यांचे व्याजदर वाढवल्यानेही काही प्रमाणात हे घडले असावे, असेही सांगितले जात आहे.
मार्च ते ऑगस्ट या सहा महिन्यांत विदेशी गुंतवणूकदार सातत्याने भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करीत होते. या कालावधीत त्यांनी 1.74 लाख कोटी रूपयांची गुंतवणूक केली होती. गेल्या पंधरा दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांनी एकूण 10 हजार 164 कोटींची गुंतवणूक काढून घेतली आहे.
या संबंधात बोलताना मॉर्निंगस्टार इंडियाचे सहयोगी संचालक – व्यवस्थापक व अभ्यासक हिमांशू श्रीवास्तव यांनी सांगितले की, विदेशी गुंतवणूकदारांमधील हा संकोच महागाई आणि विशेषत: अमेरिकेतील व्याजदरामुळे झाला आहे. आणि तो जागतिक आर्थिक वाढीबाबतच्या अनिश्चिततेला कारणीभूत ठरू शकतो. सद्यस्थितीत विदेशी गुंतवणूकदारांनी “थांबा आणि पहा’ असा दृष्टिकोन स्वीकारला आहे. तथापि ही गुंतवणूक पुन्हा वाढण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे.