चंदीगड –कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदासाठी दहा उमेदवार घोषित केले तरी त्याचा काही उपयोग होणार नाही, पंजाबात या पक्षाला सरकार स्थापन करता येणार नाही, असे आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांनी म्हटले आहे.
कॉंग्रेस आता पंजाबात सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. बरनाला येथे पक्षाच्या एका प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले की, आम आदमी पक्षाला या राज्यात सरकार स्थापन करण्यापासून आता कोणीही रोखू शकणार नाही.
दिल्लीतील विकासामुळे लोकांच्या मनात आम आदमी पक्षाविषयी विशेष सहानुभूती आणि विश्वास निर्माण झाला आहे. आमच्या पक्षाने दिल्लीत जसे काम केले आहे तसे सरकार नागरिकांना आता पंजाबात हवे आहे. आणि आम्हीही दिल्लीतील आपच्या सरकारप्रमाणेच येथे काम करून लोकांच्या विश्वासाला पात्र राहू. गेल्या 44 वर्षांत येथील लोकांनी कॉंग्रेस आणि अकाली दलाला आलटून पालटून सत्तेवर आणले. पण या दोन्ही पक्षांनी येथे काहीही केले नाही. उलट पंजाबची सर्व बाजूंनी अधोगतीच झाली आहे. येथील लोकांना आता बदल आणि चांगला पर्याय हवा आहे,आम आदमी पक्षाने तो दिला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.