नवी दिल्ली: अयोध्येत उद्या राममंदिराचा भूमिपूजन सोहळा होत आहे त्याचे स्वागत करताना कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटले आहे की अयोध्येतील राममंदिर हे राष्ट्रीय एकता, बंधुभाव आणि सांस्कृतिक सलोख्याचे प्रतीक व्हावे.
या संबंधात आज जारी केलेल्या एका निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, प्रभू रामचंद्रांच्या व्यक्तिमत्त्वातून भारताला आणि भारतीय उपखंडाला कायमच बंधुत्व व एकतेचा संदेश मिळाला आहे. जगाच्या नागरीकरणावर रामायणाची अमिट छाप आहे.
प्रभू रामचंद्र हे कायम भारत आणि भारतीय उपखंडासाठी प्रेरणादायी ठरले आहेत. प्रभू रामचंद्र हे सर्वांचेच
आहेत. त्यांनी सर्वांच्याच कल्याणाची कामना केली आहे. म्हणूनच त्यांचा उल्लेख मर्यादा पुरुषोत्तम असा केला गेला आहे, असेही प्रियांका गांधी यांनी नमूद केले आहे.