दहिवडी – टेंभू लाभक्षेत्रालगतच्या माण- खटाव तालुक्यांमधील 48 गावांमधील 13,126 हेक्टर क्षेत्रासाठी 2.50 टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतला असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माण- खटावमधील जनतेला पाणी देण्याचा दिलेला शब्द पाळला असून आपण केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे, असे प्रभाकर देशमुख यांनी स्पष्ट केले.
सांगलीच्या नेत्यांनी सांगलीतील दुष्काळी भागासाठी टेंभूचे पाणी संघर्ष करुन मिळवले. मात्र, माण- खटावला टेंभूचे पाणी अनेक वर्षे मिळत नव्हते. प्रभाकर देशमुख गेली चार वर्षे शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने टेंभूच्या पाण्यासाठी पाठपुरावा करत होते. दुष्काळी भागाला पाण्याचे आरक्षण देण्याची तसेच बंद पाइपलाइनमधून पाणी देण्याची योजना देशमुख यांनी शासनाला सादर केली. त्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य प्रस्ताव तयार करण्यासाठी टेंभूचे मुख्य अभियंता गुणाणे यांनी सविस्तर सर्वेक्षण केले. मात्र, पाण्याचे आरक्षण मिळत नव्हते. जलसंपदा अधिकारी व ग्रामस्थांना सोबत घेऊन प्रभाकर देशमुख यांनी शरद पवार तसेच जयंत पाटील यांच्यासोबत तीन बैठका घेतल्या. या योजनेसाठी त्यांनी शरद पवार व जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला.
तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार माण- खटावच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनाही याबाबतचे निवेदन देण्यात आले होते. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून जयंत पाटील यांनी माण- खटावच्या दुष्काळी जनतेला या निर्णयामुळे दिलासा दिला आहे. सातारा व सांगलीतील दुष्काळी तालुक्यांसाठी एकूण आठ टीएमसी पाणी नव्याने आरक्षित करण्यात आले असून त्यापैकी दीड टीएमसी पाणी खटावसाठी तर एक टीएमसी पाणी माणसाठी आरक्षित करण्यात आले आहे. घाणंद येथून तिसऱ्या टप्प्यात हे पाणी उचलले जाणार असून बंदिस्त पाइपलाइनमधून पाणी दिले जाणार आहे.
विरळी भागात टेंभूचे पाणी आम्ही आणणार असे वचन विरळी येथे झालेल्या जाहीर सभेत दिले होते. त्याची पूर्तता करण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले गेले आहे. यासाठी मी माझा प्रशासकीय अनुभव पणाला लावला. यात मला अधिकाऱ्यांनी चांगली साथ दिली. या निर्णयाबद्दल मी महाविकास आघाडी सरकारचा आभारी आहे.
– प्रभाकर देशमुख
(नेत, राष्ट्रवादी कॉंग्रेस, माण-खटाव)