हैदराबाद, – करोनाच्या काळातही तेलंगणाने चांगला विकास दर गाठला आहे असा दावा तेलंगणाचे अर्थमंत्री टी हरिषराव यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की ऐन करोना काळातही आमचा विकास दर 2.4 टक्के इतका होता. तर याच काळात देशाचा विकास दर मात्र उणे सात टक्के इतका नोंदवला गेला होता.
केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी विकासाचे मोठे दावे केले असले तरी आता भारत हा विकास दराच्या बाबतीत बांगलादेशाच्याही मागे पडला आहे या वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करता येणार नाही असेही त्यांनी म्हटले आहे.
तेलंगणाने 11.7 टक्के इतका वार्षिक विकास दर गाठला आहे. सन 2014 ते सन 2021 या काळात आम्ही सतत चांगला विकास दर देण्यात यशस्वी ठरलो आहोत असेही त्यांनी म्हटले आहे.
आमच्या उत्पन्नात सन 2014 च्या तुलनेत 2020-21 मध्ये 94 टक्के वाढ होऊन आमचे उत्पन्न हे 9 लाख 80 हजार कोटी रूपयांवर गेले आहे असेही त्यांनी नमूद केले.
तेलंगणाचे दरडोई उत्पन्नही राष्ट्रीय दरडोई उत्पन्नाच्या दुप्पट झाले आहे. आमचे वार्षिक दरडोई उत्पन्न आता 2 लाख 37 हजार रूपयांवर गेले असून राष्ट्रीय दरडोई उत्पन्न केवळ 1लाख 29 हजार रूपये इतके आहे असेही त्यांनी निदर्शनाला आणून दिले.