खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांचे आदेश
आळंदी – कार्तिकी यात्रा नियोजनासंदर्भात केलेल्या कामाचे नियोजन व शिल्लक राहिलेली कामे त्वरित पूर्ण करावीत असे आदेश खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले यांनी विविध शासकीय खात्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्तिक वारी सोहळ्याच्या नियोजित बैठकीसाठी आज सायंकाळी पाच वाजता आळंदी नगरपरिषद सभागृहात खेडच्या तहसीलदारसुचित्रा आमले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराज संजीवन समाधी सोहळा अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपला असताना प्रशासनाने अद्यापही महत्वाची कामे मार्गी लावली नसल्याचे निदर्शनास आणून देत आळंदी नगरपरिषदेच्या नगरसेवकांनी तहसीलदार सुचित्रा आमले यांच्याकडे करावाई करण्याची मागणी केली. यावेळी व्यासपीठावर तहसीलदार सुचित्रा आमले, मुख्याधिकारी समीर भूमकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, देवस्थानचे विश्वस्त अभय टिळक, यात्रा कमिटी सभापती सागर बोरुंदीया, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, देवस्थानचे प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर उपस्थित होते.
कार्तिकी यात्रेच्या अंतिम नियोजन बैठकीत नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, पांडुरंग वहिले, सागर भोसले, सचिन गिलबिले, नगरसेविका स्मिता रायकर, प्रतिमा गोगावले, रुक्मिणी कांबळे, पारूबाई तापकीर, स्नेहल कुऱ्हाडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातुन सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले. मरकळ रस्त्यावरील ड्रेनेज पाणी रस्त्यावरून वाहत असल्याचे, वीज कनेक्शनसाठी टाकण्यात आलेले डीपीबॉक्स खाली अवस्थेत लोकांच्या दारासमोर पडून असल्याचे यावेळी नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले.
नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे यांनी पाणी वाटपाच्या नियोजनात होत असलेला गोंधळावर प्रश्न उपस्थित करत सगळीकडे समान दाबाने पाणी वाटप करण्याची मागणी केली. शहरात प्रवेश करणाऱ्या चारही दिशांच्या रस्त्यांवरील खड्डे अद्याप बुजविण्यात न आल्याचे देखील नगरसेवकांनी सांगितले. नगरसेवकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे तहसीलदार आमले यांनी अधिकाऱ्यांना कामे तत्काळ मार्गी लावण्याचे आदेश दिले. जी कामे वर्षभर रखडली आहेत त्याबाबत लेखीस्वरूपात उत्तर देण्याची सूचना देखील त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना केली आहे.
दर्शनबारीची जागा अद्याप अनिश्चित
लाखो भाविकांना शिस्तबद्ध पद्धतीने माऊलींचे दर्शन उपलब्ध व्हावे याकरिता देवस्थानच्या वतीने इंद्रायणी नदी पलीकडे दर्शनबारी उभारण्यात येते. जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठी अद्याप जागा उपलब्ध करून न देण्यात आल्याने लाखो भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. ज्या जागा सुचविण्यात आल्यात त्याठिकाणी मंडप उभारणे जोखमीचे आहे. ते वारकऱ्यांच्या जीवावर देखील बेतू शकते.
यामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पूर्वी ज्या ठिकाणी दर्शनबारी उभारली जात होती तीच जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी देवस्थानचे विश्वस्त अभय टिळक यांनी बैठकीत केली. कालावधी कमी राहिल्याने लवकरात लवकर याबाबत निर्णय व्हावा असेही त्यांनी नमूद केले.