कल्याण – कल्याण तहसील कार्यालयात 1 लाख, २० हजारांची लाच घेताना तहसीलदार व त्यांच्या शिपायाला लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली आहे. जमिनीच्या हरकतीचा अहवाल देण्यासाठी ही लाच मागितली होती. त्याआधीच सापळा रचून एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
तहसीलदार दीपक आकडे, वय 45 व शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड, वय 45 अशी लाचेची मागणी करणाऱ्या तहसीलदार व शिपायाचे नाव आहे. कल्याण तालुक्यातील वरप गावामधील एका बांधकाम कंपनीचे जमीन विकसित करण्याचे काम कल्याण येथे सुरू आहे. या जमिनीबाबत हरकती सुनावणीचे काम कल्याण तहसील कार्यालयात पडताळणीसाठी सुरू होते. त्यांनी 1 लाख २० हजार रुपयांची मागणी केली होती.
दरम्यान, आज दुपारी एकच्या सुमारास 1 लाख 20 हजारांची लाच घेताना तहसीलदार आकडे आणि शिपाई हरड यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस यांनी रंगेहाथ अटक केली.
ही कारवाई ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली निलिमा कुलकर्णी, संतोष शेवाळे, जयश्री पवार, विनोद जाधव, पद्माकर पारधी आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.