-प्रा. शुभांगी कुलकर्णी
पूर्वीच्या काळी विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात केवळ वयाचाच नव्हे तर ज्ञान आणि भान यांच्या दृष्टीनेही एक अंतर होते. त्यामुळे शिक्षक जे काही सांगत होते, जे काही शिकवत होते, त्यावर विद्यार्थी डोळे झाकून विश्वास ठेवत असत. कारण त्यावेळी विद्यार्थ्यांकडे शिक्षकांपेक्षा प्रभावी असा ज्ञानाचा स्रोतच उपलब्ध नव्हता; परंतु आता तंत्रज्ञानाच्या झपाट्यामुळे शिक्षकांनी एकतर स्वतःमध्ये बदल करून घेतले आहेत किंवा त्यांना ते करावे लागणार आहेत. कारण शिक्षकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक झाली आहे. या बदलत्या युगाचा घेतलेला वेध…
करोनामुळे आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात काही ना काही बदल केले आहेत; परंतु शिक्षणाच्या क्षेत्रात झालेले बदल फार मोठे आहेत. गेल्या वर्षापर्यंत जगाच्या दोन तृतीयांश भागात शाळा सुरू होण्याचा, बंद होण्याचा आणि सुट्ट्यांचा काळ जवळजवळ एकसारखाच होता. परंतु 2020 मध्ये मात्र इतर वर्षांपेक्षा वेगळेच काहीतरी घडले आहे. आजमितीसदेखील जगातील सुमारे 174 देशांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः लॉकडाऊन पाळला जात आहे. ज्या-ज्या ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे, त्या-त्या ठिकाणी शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. करोनाने केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे तर शिक्षकांनाही आपापल्या घरात कैद करून टाकले आहे किंवा मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट आणि डेस्कटॉप कॉम्प्युटरमध्ये व्यस्त करून टाकले आहे. किंबहुना जगातील सर्वच शिक्षकांना करोनाने एका झटक्यात “व्हर्च्युअल शिक्षक’ बनण्यास भाग पाडले, असेही म्हणता येईल.
हजारो शिक्षिकांनी सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमांमधून अशी कबुली दिली, की काही तासांसाठीच नव्हे तर काही मिनिटांसाठीही त्यांनी यापूर्वी कधीही कॅमेऱ्याचा सामना केला नव्हता. कॅमेऱ्याबद्दल त्यांना अजिबात माहितीसुद्धा नव्हती; परंतु करोनामुळे एका झटक्यात देशातील नव्हे तर जगातील सर्वच शिक्षकांना कॅमेरा फ्रेन्डली व्हावे लागले. आजमितीस लक्षावधी, कोट्यवधी शिक्षक जगाच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात कायम ऑनलाइन असतात. कारण एकाच झटक्यात शाळा आणि महाविद्यालये व्हर्च्युअल दुनियेत प्रवेशकर्ती झाली. या बदलामुळे शिक्षकांच्या भूमिकेत काही बदल झाला आहे का, हा खरा प्रश्न आहे. शिक्षकांप्रती विद्यार्थ्यांची भावना बदलली आहे का, असाही प्रश्न आहे.
या प्रश्नाचे चपखल उत्तर देणे अवघड असले तरी एवढे मात्र गृहित धरायला हवे की आता शिकणाऱ्या आणि शिकविणाऱ्या व्यक्तीच्या मध्ये तंत्रज्ञान आले आहे आणि ते महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
पुढील पिढ्या शिक्षकांच्या तुलनेत कितीतरी अधिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असतील. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाल्यास आजमितीस ज्ञान हे एका माउस-क्लिकवर उपलब्ध झाले आहे. शिक्षकांनी एकतर स्वतःमध्ये बदल करून घेतले आहेत किंवा त्यांना ते करावे लागणार आहेत. कारण शिक्षकांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर तांत्रिक झाली आहे. करोनाचा प्रकोप यथावकाश थांबेलच; परंतु शिकण्या-शिकविण्याची पारंपरिक पद्धती पुन्हा परतणार नाही. भविष्यातील पिढ्यांना शिक्षित करण्यासाठी सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत बदल करावे लागणार आहेत, हे कटू सत्य आहे.
काही दिवसांपूर्वी सोशल मीडियात आणि पारंपरिक माध्यमांतसुद्धा वयस्क शिक्षक आणि शिक्षिकांकडून शेकडो तक्रारी आल्या होत्या. ऑनलाइन शिकविताना विद्यार्थी आपल्याला बराच त्रास देतात अशा या तक्रारी होत्या. तंत्रज्ञानाने युक्त उपकरणे चालविण्यात विद्यार्थी शिक्षकांच्या कितीतरी पावले पुढे असतात आणि त्यामुळेच ऑनलाइन शिकविताना आपण दबावाखाली असतो, असे शिक्षकांचे म्हणणे होते. एवढेच नव्हे तर शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात अनुभवाचीही समस्या अचानक उभी ठाकली आहे. ज्या शिक्षकांकडे विद्यार्थ्यांना उत्कृष्टरीत्या शिकविण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे, अशा शिक्षकांनाच आज तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याच्या साह्याने चांगले सादरीकरण करण्याचा अनुभव आपल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळेही सध्याच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे विश्व बरेच बदलून गेले आहे.
सध्या होत असलेले बदल कधी घडलेच नसते असे नाही. करोनाचे सावट असते आणि नसते तरी हे बदल कधी ना कधी झालेच असते. करोनामुळे केवळ ते एकाच झटक्यात, ताबडतोब झाले. याच कारणामुळे शिक्षकांनी गडबडीत विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकविण्याची जबाबदारी तर उचलली; परंतु आजकालच्या एक्स, वाय, झेड आणि अल्फा, बीटा जनरेशनला शिकविणे त्यांच्यासाठी फारसे सोपे राहिलेले नाही, हे त्यांच्या लक्षात आले. ऑनलाइन शिकवण्याच्या प्रक्रियेपासून अनेक खासगी शाळांतील शिक्षकांनी स्वतःला दूर ठेवले आहे, ते उगाच नव्हे. सरकारी शिक्षकांची अडचण अशी आहे की, ते अशा प्रकारची जोखीम पत्करू शकत नाहीत. अन्यथा त्रस्त तेही आहेतच.
वस्तुतः या त्रासाचे कारण विद्यार्थी नसून बदलणारे तंत्रज्ञान हे आहे. इन्स्टंट मेसेंजर, स्नॅप चॅट आणि व्हॉट्सऍपसारख्या माध्यमांतून संवादाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती विकसित होत आहेत, त्या विद्यार्थ्यांना शिक्षकांपेक्षा अधिक ज्ञात आहेत आणि अध्यापकांसाठी त्या अत्यंत जटिल आहेत. केवळ आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात नव्या तंत्रज्ञानाशी आणि नव्या पद्धतींशी परिचित असलेल्या शिक्षकांची प्रचंड कमतरता जाणवू लागली आहे. एका अहवालानुसार, पुढील पाच वर्षांत अमेरिकेत 85 टक्के शिक्षक बदलण्यात येतील. कारण आता टेक्नोस्मार्ट शिक्षकांची गरज मोठ्या प्रमाणावर जाणवू लागली आहे. भले या शिक्षकांना आपल्याच विषयाची माहिती थोडी कमी असली तरी तंत्रज्ञानाच्या बाबतीत मात्र त्यांना झेड जनरेशनच्या पुढे जावेच लागेल. तात्पर्य असे की, यावर्षीचा शिक्षक दिन शिक्षकांसमोर नवे आव्हान घेऊन आला आहे. त्यांना लवकरात लवकर टेक्नोस्मार्ट बनावे लागणार आहे. अन्यथा शिक्षकी पेशातून त्यांना बाहेर पडावे लागेल.