नवी दिल्ली – देशातील महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाची प्रगती सुरू आहे. मात्र आता या प्रकल्पाच्या पूर्णत्वाचा कालावधी 3 ते 6 महिन्यांनी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाचे काम अद्याप पूर्ण न झाल्यामुळे आता हा प्रकल्प काहीसा रखडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. आतापर्यंत प्रकल्पासाठीच्या 82 टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून गुजरात आणि महाराष्ट्रातील केवळ 23 टक्के भूसंपादनाचे काम होणे बाकी आहे, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी म्हटले आहे.
बुलेट ट्रेन प्रकल्पासारख्या प्रकल्पात ठराविक प्रमाणात जमीन उपलब्ध होईल तेव्हाच काम सुरू होऊ शकते. भूसंपादनाचे काम पुढील 3 ते 6 महिन्यात पूर्ण होऊ शकते. त्यादृष्टीने आमच्या कामाचा आराखडा तयार आहे आणि आम्ही काम सुरू करण्यास तयार आहोत. निविदा प्रक्रिया आणि भूसंपादनाला उशीर झाला आहे, ही गोष्ट खरी आहे. मात्र करोनाच्या साथीमुळेच हा उशीर झाला आहे. तरिही हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे, असेच यादव म्हणाले.
“कोविड-19 ची स्थिती सुधारल्यावर निविदा प्रक्रियेला सुरुवात केली जाईल आणि आगामी 3 ते 6 महिन्यात भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले असेल. त्यनंतर बुलेट ट्रेन प्रकल्प पूर्ण होण्याच्या प्रत्यक्ष वेळापत्रकाचा अंदाज करता येऊ शकेल.’