नवी दिल्ली :- बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना घाण्याला जुंपले आहे. सततचे सामने, स्पर्धा व त्यासाठी करावा लागत असलेला प्रवास खेळाडूंसाठी मारक ठरत आहे, अशी बोचरी टीका महान कर्णधार कपिल देव यांनी बीसीसीआयवर केली आहे.
मी जर बीसीसीआयचा अध्यक्ष असतो तर वर्कलोड निश्चितच कमी केला असता तसेच नवोदित खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली असती, असेही ते म्हणाले.
भारतीय संघाला ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा खेळायची आहे. त्यापूर्वीचे वेळापत्रक जर पाहिले तर संघ सातत्याने सामने खेळत आहे व खेळणारही आहे. त्यासाठी त्यांना प्रचंड प्रवासही करावा लागत आहे. विश्रांती दिली जात असली तरीही सामन्यांची संख्या पाहता ती देखील पुरेशी नाही. बीसीसीआय आपल्याच खेळाडूंची योग्य काळजी घेऊ शकत नाही, असेही ते म्हणाले.
मला माहीत आहे की संघ जिंकत असतो तेव्ही टीका होत नाही; परंतु संघ पराभूत झाला की टीका होते. मात्र, माझी टीका कोणा खेळाडूवर नसून बीसीसीआयवर आहे. बीसीसीआयमध्ये सुधारणा अत्यंत आवश्यक आहे. वेळापत्रकावरही विचार झाला पाहिजे. केवळ पर्याय आहेत म्हणून संघ सातत्याने खेळवत ठेवणे योग्य नव्हे.
प्रत्येक खेळाडूची कारकीर्द महत्त्वाची आहे व त्यासाठी रोटेशन हाच सर्वोत्तम मार्ग आहे. भारतीय संघाने मंगळवारी 11 वा सामना खेळला. वेस्ट इंडिज विरुद्ध आता पाच टी-20 सामनेही खेळायचे आहेत. खेळाडूंना किती प्रवास करावा लागणार आहे. वेळापत्रक तयार करताना कोणी पाहते की नाही, असा सवालही त्यांनी केला.
एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा व त्याचे वेळापत्रकही असेच त्रासदायक आहे. धर्मशाला, बंगळुरू, कोलकाता येथे भारतीय संघ खेळणार आहे. 9 विविध ठिकाणी भारतीय संघ सामने खेळणार आहे. जर मी बीसीसीआय अध्यक्ष असतो तर मी संघासाठी खास चार्टर विमानांचीच व्यवस्था केली असती. माझ्या संघाने मैदानावर सर्वोत्तम कामगिरी करावी अशी मी आशा करत असेन तर या गोष्टी केल्याच पाहिजेत, असेही कपिल यांनी म्हटले आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका कशासाठी..?
विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी भारतीय संघ आशिया करंडक तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. इतके सातत्याने सामने कशासाठी खेळवले जात आहेत. आशिया करंडक व विश्वकरंडक स्पर्धा जर खेळवली जाणार आहे तर त्यापूर्वी परत ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.