मुंबई – कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे आणि रुपयाचे अवमूल्यन झाल्यामुळे बऱ्याच प्रवासी वाहन कंपन्यांची दरवाढ चालूच आहे. टाटा मोटर्स या कंपनीने शनिवारी आपल्या विविध वाहनांच्या दरात 1.1 टक्क्यापर्यंत वाढ जाहीर केले आहे.ही दरवाढ विविध वाहनासाठी वेगवेगळी असेल असे कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ म्हणजे 23 एप्रिल पासून सुरु झाली आहे. ऍल्युमिनियम, पोलादासह कार साठी लागणाऱ्या विविध सुट्या भागाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. त्याचबरोबर इंधनाचे दर वाढत असल्यामुळे आता वाहन बाळगणे महागात पडत असल्याचे दिसून येत आहे.
मागील महिन्यात टाटा मोटर्सकडून व्यवसायिक वाहनाची दरवाढ
टाटा मोटर्स कंपनीने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 1 एप्रिल पासून दोन ते अडीच टक्के दरवाढ जाहीर केली आहे. पोलाद, ऍल्युमिनियम आणि इतर कच्च्या मालाच्या दरात गेल्या एक वर्षापासून मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्यामुळे आम्हाला दरवाढ करावी लागत आहे असे टाटा मोटर्सने म्हटले आहे.
टाटा मोटर्स कंपनीने या संदर्भात शेअर बाजारांना माहिती दिली आहे. टाटा मोटर्सने आतापर्यंत दरवाढ टाळण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. मात्र सर्वच क्षेत्रांमध्ये महागाई वाढली असल्यामुळे आम्हाला दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे कंपनीने म्हटले आहे. याच कारणामुळे गेल्या पंधरा दिवसांमध्ये ऑडी इंडिया आणि मर्सिडीज या कंपन्यांनी दरवाढ जाहीर केली आहे.