मुंबई : तारापूर औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कंपनीत झालेल्या स्फोटात जणांना आपला जीव गमावला आहे. यातील मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींना संपूर्ण वैद्यकीय साहाय्य दिले जावे असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
स्वतः मुख्यमंत्री हे बचाव कार्यावर लक्ष ठेऊन असून एनडीआरएफची मदतही घेण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ मुख्य सचिव व जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली तसेच यामधील बचाव कार्यावर आणि जखमींच्या उपचारावर प्राधान्य द्यावे असे निर्देश दिले.
बोईसर औद्योगिक वसाहतीमधील एम-2, या प्लॉटमधील कंपनीत संध्याकाळी पावणे सातच्या सुमारास भीषण स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता ही इतकी प्रचंड होती की कंपनीपासून 10 ते 15 कि.मी. परिघातील परिसर हादरला. या स्फोटात कंपनी मालकासह 8 जण मृत्युमुखी पडले आहेत तर काही जण भाजले आहेत. स्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारत कोसळली होती.