- शहरात तीन महिन्यांत एक लाख टॅंकर फेऱ्या
- पालिकेची सदोष पाणी वितरण व्यवस्थाही कारणीभूत
- वीज खंडीतमुळे पाणी पुरवठा विस्कळीत
पुणे – उन्हाच्या चटक्यामुळे पाण्याची मागणी वाढली असून मार्च- एप्रिल-मे या तीन महिन्यांत शहरात तब्बल 1 लाख 713 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या आहेत. कडक उन्हाळ्या सोबतच महापालिकेची सदोष पाणी वितरण व्यवस्था, वारंवार खंडीत होणारा वीज पुरवठा यामुळेही अनेकदा पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढली असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. अर्धा जून महिना संपला तरी अद्यापही पावसाने हुलकावणी दिल्याने टॅंकरची मागणी कायमच असल्याचे वास्तव आहे. जून महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात टॅंकरच्या फेऱ्या तब्बल 16 हजारांपेक्षा अधिक झाल्या आहेत.
तीन महिन्यांत एक लाख फेऱ्या…
शहराचा आकार बशी सारखा आहे. त्यातच, महापालिकेची पाणी वितरण व्यवस्थाही 30 ते 40 वर्षे जूनी आहे. त्यामुळे, महापालिकेस शहराच्या चढ असलेल्या भागात पुरेसे पाणी देता येत नाही. परिणामी, महापालिकेकडून शहरात समान पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आलेले असले तरी ते अतिशय संथ गतीने सुरू असल्याने हे काम पूर्ण होण्यास आणखी काही वर्षे लागणार आहेत. त्यातच, शासनाकडून महापालिकेची हद्द गेल्या पाच वर्षात जवळपास 30 ते 40 पट वाढविली आहे.
या गावांच्या पाण्याचा भारही महापालिकेवर येऊन पडला आहे. या गावांसह, महापालिकेच्या जुन्या हद्दीतही पाण्यासाठी पाण्याचे टॅंकर उपलब्ध करून द्यावे लागत आहेत. प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात शहरात 31 हजार 560 टॅंकरच्या फेऱ्या झाल्या होत्या. तर एप्रिल मध्ये हा आकडा 33 हजार 643 झाला तर मे महिन्यातही त्यात जवळपास दोन हजार टॅंकर फेऱ्यांची वाढ होऊन तो 35 हजार 510 वर गेला आहे.
बाणेर-बालेवाडीला मिळाला दिलासा…
एका बाजूला शहरात सर्वत्रच पाण्याच्या टॅंकरची मागणी वाढलेली असली तरी मागील महिन्यापासून बाणेर-बालेवाडीला दिलासा मिळाला आहे. या दोन्ही गावांचा समावेश पालिकेने समान पाणी योजनेत केलेला आहे. त्यानुसार, या भागासाठीचे काम नुकतेच पूर्ण झाले असून या भागात दररोज 60 ते 70 पाण्याचे टॅंकर द्यावे लागत होते. या योजनेनंतर आता 90 टक्के पाण्याचे टॅंकर पूर्णत: बंद झाले असून आता दिवसाला 5 ते 10 टॅंकरचा लागतात. योजनेत काही भागात योजनेच्या कामाची तपासणी सुरू असून त्यानंतर उर्वरीत टॅंकरही बंद होतील असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.