नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तामिळनाडूत ‘एन मन, एन मक्कल’ या यात्रेला हिरवा झेंडा दाखवून यात्रेला सुरुवात केली. यावेळी एका सभेला संबोधित करत त्यांनी,“तामिळनाडूला घराणेशाही, भ्रष्टाचारातून मुक्त करण्याचे काम ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेतून करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
भाजपाने तामिळनाडूतून ‘एन मन, एन मक्कल’ ( माझी जमीन, माझे लोक ) यात्रेला कालपासून सुरुवात झाली. अमित शाह यांनी रामेश्वरम येथे यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. सहा महिने ही पदयात्रा चालणार आहे. तामिळ संस्कृतीला काश्मीर ते कन्याकुमारी पोहचवण्यासाठी ही यात्रा आहे, असे विधान अमित शाह यांनी केले.
यावेळी बोलताना अमित शाह यांनी,“‘एन मन, एन मक्कल’ यात्रा ही राजकीय नाही, तर तामिळ भाषेला जगभरात पोहचवण्याचं काम करणार आहे. काश्मीर ते कन्याकुमारी आणि कोलकातापासून ते सोमनाथपर्यंत तामिळ संस्कृती या यात्रेद्वारे पोहचवली जाणार आहे.” असे म्हटले.
“तामिळनाडूला घराणेशाही आणि भ्रष्टाचारातून मुक्त करण्याचं काम ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेमार्फत करण्यात येणार आहे. तामिळनाडूमधील कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याचं काम केलं जाणार आहे. तामिळनाडूतील भ्रष्टाचारचे युग संपवून विकासाचे युग आणण्यासाठी ‘एन मन, एन मक्कल’ यात्रा आहे,” असेही अमित शाह यांनी सांगितले.