नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये काही महिनांपासून सर्व काही अलबेल नसल्याचे चित्र आहे. यात बडे नेते अजित पवार हे पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा झडत आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते असूनही ते रविवारी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित न करताच निघून गेले. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासमोरच ते उठून निघून गेल्याने या चर्चांना बळ मिळाले आणि पक्षात फूट पडल्याच्या अफवा पसरल्या.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांना अजित पवार यांच्या आधी बोलण्याची संधी दिल्याने ते नाराज झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर काही क्षणातच अजित पवार मंच सोडून निघून गेले, यावरून आता राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याच्या चर्चांना उधाण आले. राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या समारोपीय भाषणापूर्वी अजित पवार बोलतील, अशी घोषणा केली. परंतु अजित पवार त्यांच्या जागेवरून गायब होते.
त्यानंतर कार्यकर्त्यांना नाराज झाल्याचे पाहून अजित पवार हे वॉशरूमला जाण्यासाठी मंचावरून गेले असून ते लवकरच संबोधित करण्यासाठी परत येतील अशी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. यावेळी नाराज कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरू केली.
यानंतर प्रकरण वाढत असल्याचे पाहून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांचे मन वळवण्यासाठी पाठवण्यात आले. स्टेजवर भाषण देण्यासाठी त्या अजित पवार यांना मनवताना दिसल्या. मात्र अजित पवार कार्यक्रमस्थळी दाखल झाले तेव्हा शरद पवार यांनी समारोपाच्या भाषणाला सुरुवात केली होती. त्यानंतर अजित पवार यांना बोलण्याची संधी मिळाली नाही.
दरम्यान, 2019मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात आघाडीची चर्चा सुरू असताना 23 नोव्हेंबर 2019 रोजी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. या पहाटेच्या समारंभात दोघांचा शपथविधी झाल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. पण हे सरकार फक्त 80 तास टिकले होते.