श्रीनगर – अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यामुळे गेल्या 40 वर्षांपासून तिथे सुरू असलेल्या अस्थैर्य आणि अनिश्चिततेला आवर घातला जाईल. तालिबान्यांचे सरकार सर्वसमावेशक आणि व्यापक जनाधारावर स्थापित असेल आणि समानतेचा पुरस्कार करणारं असेल, असे हुर्रियत कॉन्फरन्सच्या मवाळ गटाचे प्रमुख मीरवेज उमर फारूक म्हणाले.
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे अंतरिम सरकार स्थापन झाले आहे. यावर जगभरातून राजसत्तांनी अपेक्षेप्रमाणेच भिन्न धोरण स्वीकारले आहे. काहींनी तालिबान्यांच्या सरकारला पाठिंबा दर्शविला आहे, तर काहींनी तीव्र विरोध देखील केला आहे.
याचवेळी भारतात गेल्या 20 ते 25 वर्षांपासून फुटीरतावादी कारवाया करणाऱ्या हुर्रियत कॉन्फरन्सने तालिबान्यांच्या सरकारविषयी आणि अफगाणिस्तानमधील त्यांच्या सत्तेविषयी भूमिका मांडली आहे.
शांतता आणि स्थैर्याची अपेक्षा ठेवताना मीरवेज उमर फारूक यांनी तालिबान्यांना सल्ला देखील दिला आहे. तालिबान्यांनी हे लक्षात ठेवावे की इस्लाम एक धर्म म्हणून निसंदिग्धपणे मानवी समता आणि हक्क, आर्थिक न्याय आणि धार्मिक सहिष्णुता या मूलभूत मूल्यांचा पुरस्कार करतो, असे मीरवेज म्हणाले आहेत.