कंदहार – अफगाणिस्तानमधील बऱ्याच मोठ्या भूभागावर तालिबान्यांनी ताबा मिळवला आहे. सरकारला सहाय्य करत असल्याच्या आरोपावरून तालिबान्यांनी शेकडो नागरिकांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी काही जणांची तालिबान्यांनी हत्याही केली आहे.
प्रामुख्याने सरकारी अधिकाऱ्यांचे नातेवाईक, लष्कर आणि पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आली असल्याचे मानवाधिकारवादी संघटना ह्युमन राईटस वॉच या निरीक्षक गटाने म्हटले आहे.
यासारख्या काही युद्धगुन्ह्यांचा आणि मानवाधिकार उल्लंघनाच्या गंभीर आरोपांचा तपास आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्यावतीने तपास करण्यात येत आहे, तालिबानच्या ज्या कमांडरच्या ताब्यातील क्षेत्रात हे युद्धगुन्हे घडले असतील त्यांना याबद्दल जबाबदार मानण्यात येणार आहे. तसेच या गुन्ह्यांबद्दल ज्यांना माहिती असूनही त्यांनी हे गुन्हे रोखण्यासाठी काहीच केलेले नसेल त्या कमांडरनाही यासाठी जबाबदार धरण्यात येणार आहे.
तालिबानने 8 जुलै रोजी स्पीन बोलडाकची सीमा ओलांडून स्पीन बोलडाक जिल्ह्यातल्या नागरिकांच्या घरांची झडती घेतली होती. नागरिकांबरोबर सैनिक आणि पोलिसांबाबत गंभीर गुन्हे केल्याचा आरोप तालिबानवर आहे, असे ह्यूमन राईट्स वॉचच्या असोसिएट एशियाचे संचालक पॅट्रसिया गॉसमॅन यांनी सांगितले.
तालिबान्यांनी सर्व प्रकारच्या गुन्ह्याचे आरोप फेटाळले आहेत. मात्र तालिबानच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात हिंसाचार, अपहरण आणि हत्यांची वाढती प्रकरणे चिंताजनक आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.