सांगली – सांगली शहरातील कृष्णा नदीची पाणी पातळी सध्या 55 फुटांवर पोहोचली आहे. वाढलेल्या पातळीमुळे सांगली शहर हे जलमय झाले आहे. जवळपास साठ टक्के शहर कृष्णेच्या पुराच्या विळख्यात सापडलेले आहे. तर ताकारी आणि भिलवडी याठिकाणी कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरु लागली.
रात्रीपर्यंत पाणी स्थिर होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या प्रमुख ज्योती देवकर यांनी दिली. शहरात आलेल्या पुराने 2005 मध्ये आलेल्या महापुराची पुनरावृत्ती झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सध्या सांगली शहरातला शहरी भाग पूर्ण पाण्याखाली गेला आहे. स्टेशन चौकापासून, शिवाजी स्टेडियम, मीरा हाउसिंग सोसायटी, संपूर्ण वखार भाग, एसटी स्टॅंड परिसर, सांगली शहरातला विस्तारित भाग असणारा शामराव नगर यासह सांगली-कोल्हापूर रोड संपूर्ण पाण्याखाली गेला आहे.