पेठ – येथील परिसरात पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवणे, तसेच या काळात अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग सतर्क झाला असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया, जुलाब-उलटी आदी आजारांबाबत काय काळजी घ्यावी, याबद्दल जिल्हा परिषद आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अशोक मैदाड यांनी मार्गदर्शन केले.
सध्या करोना या संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. येणाऱ्या पावसाळ्यामध्ये पावसात भिजल्यामुळे सर्दी-खोकला-ताप या आजाराचे रुग्णसुद्धा वाढण्याची शक्यता आहे. ही लक्षणे आढळून आल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्र, पेठ (ता. आंबेगाव) येथे संपर्क साधावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले. यावेळी आशा वर्कर यांनी जनजागृतीपर पथनाट्य सादर केले आहे.
सातगाव पठार भागात प्रत्येक गावांमध्ये आरोग्याच्या सुविधा तत्काळ उपलब्ध होण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने पाण्याचे नमुने तपासले जात आहेत. रोगराईवर प्रतिबंध आणण्यासाठी साथ प्रतिबंधात्मक औषध कीट सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. याप्रसंगी पेठ गावातील नागरिक गरोदर स्त्रिया, आशा वर्कर उपस्थित होते.
सरपंच सुरेखा पडवळ, उपसरपंच अनिल सणस, माजी पंचायत समिती सदस्य मनोहर भालेराव, अशोक राक्षे, डॉ. विनोद समुदाय, वैद्यकीय अधिकारी एस. पी. कोळी,आरोग्य सहाय्यक यू. जी. मुळे, आरोग्यसेविका एस. पी. राऊत, के. आर. तपस्वी, स्वाती धुमाळ, पुष्पा राजगुरू, अरुणा वरे आदी आशा वर्कर उपस्थित होते.