राजगुरूनगर (पुणे) -कोविड 19 या महामारी आजारावर गोरगरिबांना उपचार घेता यावा यासाठी राज्य शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत राज्यातील जनतेचा 100 टक्के विमा उतरविला आहे. या योजनेची अंमलबजावणी काही खासगी हॉस्पिटलमध्ये होताना दिसून येत नाही.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील काही खासगी रूग्णालय या योजनेपासून गोरगरीब रूग्णांना वंचित ठेवत आहेत. तसेच त्यांच्याकडून भरमसाठ बिले आकारत आहेत. ही बाब प्रशासनाने गंभीरतेने घेऊन अशा खासगी रूग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी रिपाइं (आठवले) या पक्षाचे पुणे जिल्हा निमंत्रक तथा खेड तालुका अध्यक्ष संतोषनाना डोळस यांनी पुणे येथील आढावा बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांना निवेदन देऊन केली.