दुबई – पाकिस्तानने सामन्यात परतण्याची एकही संधी दिली नाही, त्यांनी पहिल्या चेंडूपासून वर्चस्व राखले, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने पराभवानंतर आपले मत व्यक्त केले.
विश्वकरंडक स्पर्धांच्या इतिहासात एकदाही पाकिस्तानने भारताला पराभूत केले नव्हते. मात्र, माझा अशा काही विक्रमांमुळे हुरळून जाण्याचा स्वभाव नाही. विक्रम हे मोडले जाण्यासाठीच असतात. पाकिस्ताननेही अशा नकोश्या कामगिरीवरही मात केली.
त्यांनी फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात आमच्यापेक्षा सरस कामगिरी केली. त्यांनी जे वर्चस्व गाजवले त्यात आम्हाला एकही संधी दिली नाही. अर्थात, एका पराभवामुळे सर्वकाही संपत नाही.
आता उलट या स्पर्धेतील उर्वरित सामने जास्त महत्त्वाचे बनले आहेत. त्यामुळे त्यात सरस कामगिरी करत विजयी मार्गावर परतण्यासाठी संपूर्ण संघ कठोर मेहनत घेणार आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळवायचे असेल तर त्यासाठी पराभवातून बोध घेणे आवश्यक आहे, असेही कोहलीने सांगितले.