चंदीगड – कर्णधार सलामीवीर फलंदाज ऋतुराज गायकवाडने फटकावलेले शतक व सत्यजीत बच्छाव आणि अझीम काझी यांनी केलेल्या गोलंदाजीच्या जोरावर महाराष्ट्राने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी केरळचा 40 धावांनी पराभव केला.
ऋतुराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने पवन शहाच्या साथीत धडाक्यात सुरुवात केली. या जोडीने 84 धावांची सलामी दिली. शहा 31 धावांवर बाद झाला.
ऋतुराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने अझीम काझीच्या साथीत संघाला दीडशतकी धावांच्या पुढे मजल मारून दिली. काझी बाद झाल्यावर ऋतुराजने आपले शतक साकार केले. त्याने आपल्या 114 धावांच्या खेळीत 68 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार व तब्बल 7 षटकार फटकावले. महाराष्ट्राचा डाव 20 षटकांत 4 बाद 167 असा रोखला गेला.
विजयासाठी 168 धावांचा पाठलाग करताना केरळचा डाव 20 षटकांत 8 बाद 127 असा रोखताना महाराष्ट्राने 40 धावांनी हा सामना जिंकला. केरळकडून रोहन कन्नुमलने 58 धावांची खेळी केली. मात्र, त्याला अन्य फलंदाजांची साथ लाभली नाही. महाराष्ट्राकडून सत्यजीत बच्छावने 11 धावांत 3 गडी बाद केले. काझीने 25 धावांत 2 बळी घेतले.