नवी दिल्ली –मुंबईच्या क्रिकेटची पंढरी मानल्या गेलेल्या वानखेडे स्टेडियमवर तब्बल 34 वर्षांपूर्वी भारताचा माजी कर्णधार महंमद अझरुद्दीनने एकदिवसीय कारकीर्दीतील पहिले शतक साकारले होते. यावेळी नाव तेच असले तरीही हा अझरुद्दीन मात्र, वेगळा आहे.
केरळच्या या नवोदित खेळाडूने केवळ 54 चेंडूंत नाबाद 137 धावांची वादळी खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर केरळने मुंबईचा सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा आठ गडी राखून पराभव केला. हा मुंबईचा सलग दुसरा पराभव ठरला.
अझरुद्दीनने 9 चौकार व 11 षटकारांची आतषबाजी करताना अवघ्या 37 चेंडूंत शतक झळकावले. या स्पर्धेतील हे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक ठरले. अझरुद्दीनला सुरेख साथ देताना रॉबिन उथप्पाने 33 व कर्णधार संजू सॅमसन 22 यांची उत्तम साथ लाभल्याने केरळने 197 धावांचे लक्ष्य 16 व्या षटकांत गाठत यंदाच्या स्पर्धेतील सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार सूर्यकुमार यादव 38, आदित्य तरे 42 व यशस्वी जयस्वाल 40 यांच्या फलंदाजीच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 7 बाद 196 धावा केल्या होत्या. मात्र, दीशाहीन गोलंदाजीमुळे मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला.
संक्षिप्त धावफलक –
मुंबई – 20 षटकांत 7 बाद 196 धावा. (आदित्य तरे 42, सूर्यकुमार यादव 38,के. एम. आसिफ 3-25) पराभूत वि. केरळ – 15.5 षटकांत 2 बाद 201 धावा. (महंमद अझरुद्दीन नाबाद 137, रॉबिन उथप्पा 33, शम्स मुलानी 1-41)