ढाका: देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणारे बांगलादेशी क्रिकेटपटू त्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाच्या मार्गाने जात असताना, बांगलादेशचा कर्णधार शाकीब अल हसनवर कायदेशीर कारवाईची टांगती तलवार राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शाकीबने बांगलादेश क्रिकेट संघटनेबरोबर (बीसीबी) केलेल्या लिखित कराराचा भंग केल्याने तो सध्या वादाच्या केंद्रस्थानी सापडला आहे.
विशेष म्हणजे, नजीकच्या भविष्यात बांगलादेश क्रिकेट संघ टी-20 मालिकेसाठी महत्त्वाच्या अशा भारताच्या दौऱ्यावर जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर शाकीबविरोधात उठलेले वादाचे मोहोळ शमण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे संपूर्ण संघाच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच या कायदेशीर कारवाईमुळे शाकीब जर या दौऱ्याला खरोखरच मुकला, संघाचे नेतृत्व द्यायचे कुणाकडे, हा प्रश्नही भेडसावणार आहे.
बीसीबीसमवेत झालेल्या करारानुसार कोणत्याही क्रिकेटपटूला कोणत्याही जाहिरातदारांसाठी काम करावयाचे असल्यास (एण्डोर्समेंट) त्याची कल्पना मंडळाला द्यायची असते. शाकीबने देशातील विख्यात टेलिकॉम कंपनी “ग्रामीणफोन’ समवेत केलेला जाहिरातविषयक करार हे बीसीबीबरोबरच्या कराराचे उल्लंघन ठरले आहे.
बीसीबीचे अध्यक्ष नझमूल हसन यांनी म्हटले आहे की, “ग्रामीणफोन’ या देशांतर्गत टेलिकॉम कंपनीने नुकतेच जाहीर केले आहे की, राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार शाकीब अल हसन त्यांच्या कंपनीचा ब्र्रॅण्ड ऍम्बेसेडर’ बनला आहे. वास्तविक “रोबी टेलिकॉम’ ही कंपनी बांगलादेश क्रिकेट संघाची अधिकृत प्रायोजक असताना, शाकीबने “रोबी’ची प्रतिस्पर्धी कंपनी असलेल्या “ग्रामीणफोन’शी करार केल्याने तो औचित्यभंग तर ठरतोच, शिवाय तो कायदेशीर कारवाईलाही पात्र ठरतो.
त्यामुळे बांगलादेश क्रिकेटमंडळ आता कोणालाही क्षमा करण्याच्या मन:स्थितीत नाही. कोणताही खेळाडू कितीही मोठा असला, तरी कोणाचेही असे वर्तन खपवून घेतले जाणार नाही. संबंधित खेळाडू आणि कंपनी, अशा दोघांकडून मोठी नुकसान भरपाई वसूल केली जाईल, असेही नझमूल हसन यांनी जाहीर केले आहे.
बीसीबीकडे सहकारी क्रिकेटपटूंनी केलेल्या 11 मागण्यांच्या “चार्टर ऑफ डिमांड’विरोधात सूडबुद्धीने बीसीबीने आपल्याविरोधात कायदेशीर कारवाईची धमकी दिल्याचे मत शाकीब अल हसनने व्यक्त केल्याचे त्याच्या नजिकच्या सूत्रांनी सांगितल्याचे समजते. यामुळे शाकीबचा भारत दौरा धोक्यात आला आहे.
काय आहेत मागण्या?
मुशफिकूर रहीम, मोहम्मदुल्लाह रियाध यांच्यासह शाकीब अल हसन आणि अन्य काही क्रिकेटपटूंनी बीसीबीविरोधात आपल्या 11 मग्गण्यांचे निवेदन नुकतेच सादर केले होते. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेतील मानधन वाढवावे, दैनंदिन भत्त्यांमध्ये वाढ करावी, राष्ट्रीय स्पर्धा आणि बांगलादेश प्रिमियर लीगमध्ये खेळाडूंना एकसमान संधी दिली जावी, अशा आशयाच्या या मागण्या होत्या. या मागण्या अद्याप मंजूर झालेल्या नाहीत.