पुणे – आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात रताळ्यांची मोठी आवक झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट आवक झाली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्याने भाव कमी मिळत आहे. वीस वर्षांतील हा नीचांकी भाव असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. घाऊक बाजारात किलोला 25 ते 30 रुपये भाव मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव, मांजरगाव, वाशिंबासह इतर काही गावांतून येथील बाजारात रताळ्यांची आवक होत आहे. यंदा रताळ्यास पोषक वातावरण होते. त्यामुळे उत्पादन जास्त झाले आहे. परिणामी, आवक जास्त झाली आहे. गेल्या वर्षी येथील बाजारात सुमारे 5 हजार पोती आवक झाली होती. यंदा ती 8 ते 10 हजार पोती आवक झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील आडते अमोल घुले यांनी दिली. कर्नाटक रताळ्याला किलोला 20 ते 22 रुपये भाव मिळत आहे.
अर्धा एकर शेतामध्ये रताळींची लागवड केली. पोषक हवामानामुळे यंदा उत्पादन अधिक झाले आहे. मागील 20 वर्षांपासून मी येथील बाजारात रताळी विक्रीसाठी आणतो. त्या कालावधीत मिळालेला हा नीचांकी भाव आहे, असे सोलापूरचे शेतकरी श्रीरंग चौधरी म्हणाले.