लखनौ – उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आज (गुरुवारी) जाहीर करण्यात आले आहेत. राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात सत्ता राखण्यात भाजपला यश आलं आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली लादलेली उत्तर प्रदेशची निवडणूक भाजपने बहुमतासह जिंकल्याने पक्षातील योगींचें वजन देखील वाढले आहे. दरम्यान उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना योगींच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन समाजवादी पक्षाच्या गोटात सामील झालेल्या स्वामी प्रसाद मौर्य यांना परराभवाचा सामना करावा लागला आहे.
ओबीसी समाजाचे नेते मौर्य यांनी कुशीनगर जिल्ह्यातील फाझीलनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांना भाजपच्या सुरेंद्र कुमार कुशवाह यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मौर्य यांनी आपला पराभव स्वीकारला असून याबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या ट्विटर खात्यावर मौर्य यांनी, सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन. मी जनादेशाचा आदर करतो. मी निवडणूक हरलोय, हिम्मत नाही. संघर्षाची मोहीम सुरूच राहणार आहे.” असा संदेश दिला आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर स्वामी प्रसाद मौर्य, दारा सिंह चौहान व धरमसिंह सैनी या योगी सरकारमधील मंत्र्यांनी राजीनामा देत अखिलेश यादव हातमिळवणी केली होती. तिघांनी देखील समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली. अशातच मौर्य यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
स्वामी प्रसाद मौर्य यांनी भाजपला रामराम ठोकत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी देखील त्यांनी निवडणुकांपूर्वी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे. राज्यात सत्ता येणाऱ्यांसोबत स्वामी प्रसाद मौर्य जातात, त्यांना राजकीय हवेची दिशा अचूक कळते अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र यावेळी मौर्य यांचा राजकीय अंदाज चुकला असेच म्हणावे लागेल.